Monday, September 14, 2020

भाग-३ सोशल मीडिया संधी आणि फायदे

 


मागील भागात आपण सोशल मीडियाचा तरुणाई वर असलेला प्रभाव आणि त्याची कारणं बघितली.  त्याचबरोबर  आपण  काही  उदाहरणं बघितली ज्यामध्ये  या सोशल  मीडियाचा  विविध क्षेत्रांमध्ये वापर केला जातो.

या भागामध्ये आपण अशाच सोशल मीडियावरील संधी आणि त्याचे फायदे याबद्दल  माहिती घेणार आहोत.

सोशल मीडिया हे माध्यमच एक जादुई  वरदान आहे असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. आजच्या काळात एकही गोष्ट अशी नाही जी आपण सोशल मीडिया व अनेक नेटवर्किंग साईट्स चा वापर करून घरबसल्या करू शकत नाही!



  1. सोशल मीडियाने जगाला आपलंसं केलं आहे.त्यामुळे आपले विचार, कल्पना जगात कोठेही  पोहोचवता येतात. तसच याद्वारे अनेक नवीन व उपयुक्त ओळखी निर्माण होतात.
  2.  सोशल मीडियाने शिक्षण क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.  आजच्या मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर ज्यांनी या क्षेत्रात एक वेगळीच उंची गाठली आहे त्यांच्या अनुभवाचे बोल मुलांपर्यंत सहज पोहोचू शकतात व त्यामुळे त्यांना करिअर निवडीच्या गोंधळात एक दिशा प्राप्त होते व ते यशस्वी होतात. हे सगळं ज्ञान अगदी माफक दरात म्हणजेच इंटरनेट चा खर्च सोडल्यास अगदी मोफत उपलब्ध होत आहे.
  3. सोशल मीडिया हा फक्त मुलांसाठीच नव्हे तर ज्येष्ठ किंवा वयोवृद्ध लोकांसाठी देखील तितकाच उपयुक्त आहे. आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर लॉकडाऊन च्या काळात बऱ्याच एकट्या राहणाऱ्या वृद्धांना किंवा वृद्ध जोडप्यांना याच सोशल apps मुळे गरजूंपर्यंत किराणा, भाजीपाला, औषधं या गरजेच्या वस्तू वेळेत व सुखरूप पोहोचू शकल्या. अशा परिस्थितीत सोशल  मीडिया हा अडचणीच्या वेळी मदतीसाठी धावून येणारा सोबतीच म्हणावा लागेल.
  4. फक्त मदत व माहिती साठीच नव्हे तर  आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देखील सोशल नेटवर्किंग साईट्स उपयोगी पडतात. याच सोशल साईट्सचा वापर करून व्यवसाय जागतिक पातळीवर नेता येतो. यातला आणखी एक फायदा म्हणजे, यामुळे आपण व्यवसायात नफा तर कमवतोच, पण त्याचबरोबर आपला व्यवसाय अगदी कमी खर्चिक होतो.

  5. सोशल मीडिया हा विविध NGOs, तसच अनेक सामाजिक संस्थांसाठी देखील एक मदतनीस म्हणून काम करतो. याद्वारे समाजातील गरीब, वंचित लोकांपर्यंत सहज मदत पोहोचू शकते. ती मदत आर्थिक असो वा वस्तू स्वरूपातील, आपण ती घरबसल्या अशा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे सोशल मीडिया हा “एकमेकां सहाय्य  करू अवघे धरू सुपंथ!” ही उक्ती खरी करण्यात एक मोलाचा वाटा उचलतो असच म्हणावं लागेल.
  6. सोशल मीडियाचा आपण प्रबोधनासाठी वापर करून समाजातील  अनेक अनिष्ट प्रथांवर बंधनं आणू शकतो व त्यामुळे त्रस्त असलेल्या अनेक जमातींना आपण मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवू शकतो.
  7. सोशल मीडियाने सामान्य लोकांचीच नव्हे तर सरकारची देखील तितकीच मदत केली आहे.याच्या मदतीने हेरगिरी करून देशावर होणाऱ्या आकस्मिक व अप्रत्यक्ष आशा cyber हल्ल्याला रोखता येऊ शकते, व शत्रूच्या नापाक इराद्याला आळा घालता येतो.

 हे तरी खरंच आहे की सोशल मीडिया हा आपल्या सर्वांसाठीच एक वरदान ठरत आहे. त्याचा उपयोग गरीब-वंचितांपासून ते सर्वसामान्य, व्यापारी व सरकारपर्यंत सर्वांनाच झाला आहे. पण आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की सोशल मीडिया हे एक तंत्रज्ञान आहे आणि त्याचा वापर जसा चांगल्या कामांसाठी होतो तसाच तो वाईट कामासाठी देखील केला जाऊ शकतो. काही समाजकंटक याचा गैरवापर  देखील करत आहेत हे नक्कीच, पण आपण  एखाद्या गोष्टीचा उपयोग कशासाठी आणि कोणत्या हेतूने करावा हे आपण सद्सद्विवेक बुद्धीने विचार केल्यास आपल्याला नक्की लक्षात येईल. बाकी सुज्ञास आणखी काय सांगणे ! 

सोशल मीडिया चर्चा आणि संभ्रम या लेखनमालेतील शेवटचा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला आपल्या प्रतिक्रिया COMMENT BOX मध्ये कळवा ! त्याचबरोबर  माझा ब्लॉग जास्तीत जास्त SHARE करा !आणि नवीन   ब्लॉगच्या UPDATES साठी माझ्या ब्लॉगला FOLLOW करा !

Credits:-
Google-social media- images.

Wednesday, September 2, 2020

भाग-२ सोशल मीडिया आणि तरुणाई

 


  

मागील भागात आपण सोशल मीडियाबद्दल थोडीशी माहिती घेतली. पण जाता जाता आपल्याला एक प्रश्न पडला होता. तो म्हणजे; 

अशा या बहुपयोगी आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी खुल्या असलेल्या सोशल मिडीयाकडे सर्वात जास्त प्रमाणात तरुणाईच का बरं आकर्षित झाली??? 

त्यामागची काही कारणं आपण या भागात समजून घेऊ.

युवा वय किंवा कुमारवय हे वयच ताण तणाव किंवा वादळाचं वय म्हटलं जातं. या वयात मुलामुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यामुळे मनात विचारांची प्रचंड खळबळ माजलेली असते. “लाथ मारेन तिथे पाणी काढेन!” असा दांडगा उत्साह असतो. एखादी गोष्ट किंवा बऱ्याचदा मनात आलेली तीव्र भावना कोणापाशी बोलून दाखवावी हे कळत नसतं.  अशावेळी आपल्याबरोबरच्या, समवयस्क व्यक्तीला आपलं हे बोलणं पटेल आणि आपल्या मनाचं समाधान होईल असं तरुणांना वाटू लागतं. पण दरवेळी तो माणूस आपल्या समोरच असेल असं काही नाही किंवा काहीवेळेस फोन वर नीट बोलताही  येत नाही अशावेळी whatsapp, facebook, इ. सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स कामी येतात आणि म्हणूनच मुलांची पसंती याकडे जास्त पहायला मिळते.

यामध्ये आणखी एक सर्वात महत्वाचं  कारण म्हणजे  तरुणांची असलेली ‛grasping power’ म्हणजेच ‛आकलनशक्ती’, ही इतर  वयातील माणसांपेक्षा अधिक  असते . म्हणूनच कोणतंही  ज्ञान किंवा नवीन  तंत्रज्ञान आत्मसात करण्याची किंवा शिकण्याची प्रवृत्ती तरुणांकडे जास्त  पहायला मिळते. त्यामुुळेच काळाच्या ओघात विकसित झालेल्या नवीन गोष्टींशी तरुणाई लवकर जुळवून घेऊ शकते.



त्याचबरोबर या वयात ‛peer pressure’  हाताळणं ही एक अतिशय अवघड गोष्ट असते.  आपल्या ‛friend circle’ मध्ये  एखादी गोष्ट चर्चेत असेल तर त्याचा परिणाम साहजिकच त्या समूहातील प्रत्येक व्यक्ती वर होतो. त्यामुळे ती गोष्ट निश्चितच करावीशी वाटते. मग ते कोणताही ऑनलाइन गेम खेळणं असो अथवा अन्य उपकरणांंचा वापर असो जिकडे समूहाचा कल,  त्याच गोष्टी समूहाच्या प्रभावाखाली येऊन एखादा तरुण करू पाहतो. म्हणून तरुणाई सोशल मिडियाकडे वळण्याचं हे एक कारण असू शकतं.

peer pressure बरोबरच या वयात  तरुण पिढीमध्ये ‛spotlight syndrome’ दिसून येतो. म्हणजे या वयात मुलामुलींना आपण सतत चर्चेत राहावं असं वाटत असतं.तसंच सर्वांचं सतत आपल्याकडे लक्ष आहे असं तरुणांना वाटत असतं. त्यामुळेच आपण  सर्वांमध्ये ‛trending’ कसे राहू याचा प्रयत्न प्रत्येक तरुण करत असतो. मग ट्रेंड म्हणून एखादी गोष्ट पोस्ट करणं असो वा फक्त ट्रेंड म्हणून एखादी सिरीज बघणं अथवा ऍप  वापरणं असो  सतत चर्चेत राहण्यासाठी तरुण हे सर्व करू पाहतात.

सोशल मीडियामुळे हल्लीचं जग खूप जवळ आलंय. आपण घरबसल्या आपल्या मनातील एखादी गोष्टं जगाच्या पाठीवर कोठेही याद्वारे पोहोचवू  शकतो. याच संधीचा फायदा अनेक तरुण व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी करून घेताना आपल्याला पाहायला मिळतात. मग ते अगदी ‛e-commerce’ असो वा ‛digital marketing’. हे तरुण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली उत्पादनं किंवा सेवा जगाच्या पाठीवर कुठेही पुरवू शकतात आणि त्यातून त्यांना प्रचंड नफा देखील मिळतो. त्याचबरोबर पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा  अनेक सोशल नेटवर्किंग  तसंच informative साईट्स चा आधार घेतात. यामधून ते अनेक तज्ज्ञांची ‛lectures’  किंवा ‛seminars’ घरबसल्या attend  करू शकतात. यामुळे त्यांंना फक्त पुस्तकी ज्ञान न मिळता व्यवहार ज्ञान देेखील प्राप्त होते. तसच शिक्षणानंंतरच्या अनेक व्यावसायिक व अर्थार्जनाच्या संधींबाबत त्यांना माहिती मिळते. म्हणूनच या तरुणाईला सोशल मीडिया आपलासा वाटतो.

ही आणि अशी बरीच ‛चांगली- वाईट’ कारणं आपल्याला देता येतील की ज्यामुळे आजची तरुणाई सोशल मिडीयाकडे जास्त वळते. त्याचे फायदे आणि तोटे  देखील बरेच असू शकतात.त्याचबरोबर त्याचे अनेक चांगल्या व वाईट गोष्टींसाठी देखील वापर होऊ शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सोशल मीडियामधील संधी आणि दुरुपयोग; याबद्दल आपण पुढच्या भागात  चर्चा करणार आहोत.

माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर  जास्तीत जास्त SHARE  करा ! त्याचबरोबर नवीन ब्लॉगच्या UPDATES साठी माझ्या ब्लॉग ला FOLLOW करा !  आणि या विषयावर आपली काय प्रतिक्रिया आहे ती मला COMMENT BOX  मध्ये नक्की कळवा !

 


दशावतार